मागील काही वर्षात भारतात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा फायदा दिसू लागला असून, भारत आता जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होण्याच्या मार्गावर असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताजा अहवालानुसार 2019 साली मार्च महिन्यापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 7.3 वेगाने आणि त्यानंतर 7.5 टक्के वेगाने वाढेल. तसेच जागतिक वाढीमध्ये भारताचा वाटा 15 टक्के असेल. एक वार्षिक अहवाल सादर करताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारतीय मिशन चीफ रानिल सालागादो यांनी सांगितले कि, ”परचेंजिंग पॉवर पॅरिटी (PPP) च्या बाबतीत एकूण जागतिक वाढीमध्ये 15 टक्के वाटा भारताचा असेल. हा वाट चीन च्या दर्जाचा नसला तरी सकारात्मक आहे. तसेच आयएमएफ भारताकडे दीर्घकालीन जागतिक वाढीचा स्रोत म्हणून पाहत आहे.”
“भारतातील कार्यक्षम (उत्पादक) लोकसंख्येमध्ये घट होण्यास अद्याप तीन दशकांचा काळ बाकी आहे. हा खूप मोठा काळ आहे. आशिया खंडात भारतासाठी ही एक संधी आहे. अगदी मोजक्याच आशियाई देशांकडे अशी संधी आहे. त्यामुळे पुढची तीन दशके किंवा त्याहून मोठ्या काळासाठी भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा स्रोत राहील. पुढच्या तीन दशकांमध्ये भारतात, तेच होईल जे काही वर्षांपूर्वी चीनमध्ये झाले होते.” असेही सालगादो यांनी सांगितले.
काही कडवट आर्थिक सुधारणांच्या निर्णयांमुळे मागील दोन वर्षांपासून टीकेचे धनी झालेले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तसेच सरकारसाठी हि दिलासादायक बातमी आहे.