आघाडीचे स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रसंगी बोधचिन्हात बदल केला आहे. दोन दशकांहून अधिक जुना असलेल्या तपकिरी रंगाचा लोगो बदलत आता एनएसईने मॅरिगोल्ड, पिवळा, लाल आणि निळ्या रंगाचा समावेश असलेला नवा लोगो आणला आहे. हे चारही रंग अखंडत्व, उत्कृष्टता, विश्वास आणि बांधिलकी दर्शवतात.
दिल्ली येथे पार पडलेल्या एनएसईच्या रौप्यमहोत्सवात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल उपस्थित होते.
वर्षाच्या अखेरपर्यंत एनएसई सर्व नियामक अडथळ्यांना नक्कीच दूर करेल. शिवाय चालू वर्षात एनएसईचा आयपीओ देखील आणण्याचा प्रयत्न असल्याचे एनएसईचे सीईओ विक्रम लिमये यांनी सांगितले.