मागील आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स ची विक्रमी वसुली झाली असल्याचे वृत्त आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा भरणा १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला आहे.
शबरी भट्टसाली या सीबीडीटीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार २०१७-१८ या वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा देखील उच्चांक झाला असून तब्बल ६.९२ कोटी करदात्यांनी कर परतावा भरला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या म्हणजे २०१६-१७ च्या ५.६१ कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल १.३१ कोटी जास्त करदात्यांनी रिटर्न फाइल केल्याचे भट्टसाली म्हणाल्या. या वर्षीही कर परतावा भरणाऱ्यांची संख्या सव्वा कोटींनी वाढेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले, असे वृत्त पीटीआयनं दिलं आहे
ईशान्य भारताचे प्राप्ती कर खात्याचे मुख्य आयुक्त एलसी जोळी रानी यांच्या सांगण्यानुसार ईशान्तूय भारतातूनही सात हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.७ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी ईशान्य भारतातून सहा हजार कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला होता.
तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईशान्य भारतातून ८,३५७ कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्सच्या भरण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आयकर सेवा केंद्रे उभारण्यात येत असून जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.