लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
ग्राहक पहिल्याच प्रेझेन्टेशनमधे समाधानी होण्याची शक्यता खूपच कमी असते. त्याला बरेच प्रश्न असतात, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवे असते.
अशावेळी जर त्याच्या पहिल्याच प्रश्नाला तुम्ही तुमच्याकडे असलेली सगळीच माहिती देऊन टाकली तर त्याच्या पुढच्या प्रश्नावर त-त प-प शिवाय तुम्ही बाकी काहीच बोलू शकणार नाही, आणि साहजिकच ग्राहक तुम्हाला पुरेशी माहिती नाही असा समज करून घेईल. ज्या व्यावसायिकाला स्वतःच्या प्रोडक्ट बद्दल माहिती नाही त्याचे प्रोडक्ट ग्राहक कधीच खरेदी करणार नाही.
आपल्याकडे आपल्या प्रोडक्ट वा सेवेविषयी भरपूर माहिती असते. दिवसाला शेकडो ग्राहकांना भेटत असल्यामुळे आपल्या प्रोडक्टविषयी माहितीचा मोठा शब्दसंग्रह आपल्याकडे तयार झालेला असतो. परंतु हा शब्दसंग्रह चर्चेच्या पहिल्याच फेरीत कधी संपवायचा नसतो. ग्राहकाचं समाधान पूर्ण माहिती ऐकून होत नसतं, तर त्याच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाल्यावर होत असतं.
ग्राहकाला प्रोडक्ट ची माहिती सांगायला सुरुवात केल्यावर आपल्याकडे असलेल्या शब्दसंग्रहापैकी (माहितीपैकी) १० टक्केच माहिती द्यावी. त्यात त्याच समाधान होणार नसतंच. तो पुढचा प्रश्न विचारणार असतोच. त्या पुढच्या प्रश्नाला पुन्हा मोजक्या शब्दात उत्तर द्यायचं असतं. त्याचे प्रश्न संपत नाही तोपर्यंत तुमचे शब्द संपता कामा नये हा अलिखित नियम पाळलाच गेला पाहिजे. ग्राहक पाच सहा पेक्षा जास्त प्रश्न शक्यतो विचारत नाही. अशा वेळी तुमचा शब्दसंग्रह त्यांच्या अपेक्षित प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरे देण्यासाठी पुरून उरतो. हा उरलेला शब्दसंग्रह म्हणजे इमर्जन्सी साठी असलेला स्टॉक समजावा. इतकी माहिती सांगूनही ग्राहकाचे समाधान होणार नसेल तर मग हि उरलेली माहिती कामी येऊ शकते.
हा नियम इतर चर्चेच्या वेळीसुद्धा लक्षात ठेवायला हवा. बिझनेस मीटिंगमधे, एखादी डील करतेवेळी, किंवा इतर काही चर्चा करतेवेळी, अगदी एखाद्या ठिकाणी भाषण देताना, माहिती देताना, प्रत्येक ठिकाणी मर्यादित शब्दांचा वापर आवश्यक ठरतो.
हा नियम माझ्याकडून फक्त लेख लिहिताना मोडला जातो, बाकी इतर वेळी मीसुद्धा जमेल तेवढं मर्यादित बोलण्याचा प्रयत्न करत असतो. या नियमाचा मला प्रॅक्टिकल अंदाज MTS ची फ्रँचाइजी असतानाच आला होता. ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही मर्यादित शब्दात माहिती द्यायचो, आणि महत्वाची माहिती हुकुमी एक्क्यासारखी राखून ठेवायचो. हाच अनुभव माझ्या इतर व्यवसायातही आला.
ग्राहकांशी बोलताना मर्यादित बोलणं नेहमीच फायद्याचे असते. यामुळे त्यांना हवी असलेली, आणि आपण देऊ इच्छित असलेली, सगळी माहिती त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणून देता येते, त्यांच्या प्रश्नांचा आणि तुमच्या उत्तरांचा योग्य संगम साधला जातो. सांगायचं सगळंच पण एकाच वेळी नाही. म्हणजे ग्राहकांचेही समाधान होते आणि तुम्हाला त्यांच्याशी डील करताना काही अडचण येत नाही. शब्दांचा वापर जेवढा मर्यादित, तेवढी व्यवहार होण्याची शक्यता जास्त.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा..
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील