सगळं चांगलं चालू आहे, तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. पण काय?


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मला भेटायला येणाऱ्या, किंवा कॉल करणाऱ्या बऱ्याच व्यावसायिकांची एक सारखीच तक्रार असते.
व्यवसाय चांगला चालू आहे, पण तरीही काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतंय, काहीतरी चुकत असल्यासारखं वाटतंय.

मला आता या प्रश्नाची सवय झाली आहे. आणि याच उत्तरही माहित झालं आहे. या सगळ्यांशी बोलताना मी त्यांनाच असे काही प्रश्न विचारतो कि त्या उत्तरातच त्यांना काय चुकतंय हे लक्षात येत. या सगळ्यांची समस्या एकंच असते ‘वेळ पुरत नाही’. नवीन प्रयोग करायचेत, व्यवसाय वाढवायचं, नेटवर्क मोठं करायचंय, पण वेळ भेटत नाही. आत्ताच्या परिस्थितीत पैसे मिळतोय पण जे करायचं ठरवलं आहे त्यासाठी वेळ भेटत नाहीये.

वेळ का भेटत नाहीये? या प्रश्नच उत्तर सुद्धा त्यांच्याकडेच असतं, पण ते लक्षात येत नसतं. वेळ न भेटण्याचं मोठं कारण असतं ते म्हणजे ते प्रोसेस मधे अडकलेले असतात. प्रत्येक काम स्वतः करण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी वेळ मोकळा भेटण्याची शक्यताच नसते.

तीन चार महिन्यांपूर्वी एकाचा कॉल आला होता. घरगुती स्तरावर जेवणाचे डबे पुरविण्याचा व्यवसाय आहे. ग्राहक भरपूर आहेत. घरातील सगळे जण या व्यवसायात आहेत. आता त्यांना काही फराळाचे पदार्थ, कोथिंबीर वडी असे काही पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे.पण यासाठी वेळच उपलब्ध होत नाहीये अशी समस्या होती. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सगळेच व्यस्त असतात. त्यामुळे नवीन काही सुरु करण्याची संधी मिळत नाहीये. प्लॅन तयार आहे पण वेळ नाहीये अशी परिस्थिती.

त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं कि ते डबे पुरविण्याचे काम स्वतः करतात. दिवसातील सहा तास डबे सप्लाय करण्यातच जातात. आता डबे सप्लाय करणे हे काही स्किल चे काम नाही. एक चॅनल ठरला कि फक्त दररोज ठरलेल्या ठिकाणी डबे देत जायचे. अशावेळी त्यात स्वतः अडकून पाडायची गरज काय आहे? यासाठी एखादा कर्माचीसुद्धा पुरेसा आहे. पण त्याला पगार दिला तर खर्च वाढेल या हिशोबाने ते सगळी कामे स्वतःच करत होते. पण खरं तर ते ते दिवसातले सहा सात तास अशा कामासाठी वाया घालवत होते ज्यातून त्या कामाच्या प्रमाणात काहीच आउटपुट नाही.

एवढी चर्चा झाल्यानंतर आपल्याला जे चुकल्यासारखं वाटतंय ते काय आहे हे त्यांच्या लक्षात आलं. समस्या लक्षात येत नाहीये किंवा चुकल्यासारखं जे वाटतंय ते म्हणजे, वेळ का पुरात नाहीये याच मिळत नसलेलं उत्तर. ते प्रोसेस मधे अडकले होते. यानंतर मात्र पुढे काय करायचंय हे त्यांच्या लक्षात आलं. डबे सप्लाय करण्यासाठी एक कर्मचारी जरी नियुक्त केला तरी सहा सात तास वाचतात, आणि या वाचलेल्या वेळेत ते त्यांचा व्यवसायात वाढ करण्याचा प्लॅन अमलात आणू शकतात हे त्यांच्या लक्षात आलं. डबे पुरविण्यासाठी कर्मचारी नियुक्त केल्यामुळे जो खर्च वाढलाय त्याच्या तीन चार पट उत्पन्न नक्कीच वाढू शकेल.

आपल्यातील बऱ्याच जणांची समस्या कमी पडत असलेला वेळ हीच आहे. पण आपला जो वेळ खर्च होतोय तो नक्की योग्य ठिकाणी खर्च होत आहे का याचाही आपण अभ्यास करायला हवा. बरेच जण प्रोसेस मध्ये अडकलेले आहेत. खरं तर उद्योजकांनी व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर हळूहळू स्वतःला मॅनेजमेंट पुरतं मर्यादित करायचं असतं. इतरांकडून काम करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करायचे असते. वेळ भेटत नाही हे उत्तर असू शकत नाही. अशा उत्तराचा अर्थ आपल्याला आपले काम मॅनेज करता येत नाही असा होतो.

अजूनही कित्येक जण दोन तीन व्यवसाय चालवणे शक्य नाही, किंवा हाच पसारा आवरणे अवघड होऊन बसले आहे त्यात आणखी वाढ कशाला करायची? असे म्हणताना दिसतात. पाच पन्नास कंपन्या असलेल्या उद्योजकांकडे जर वेळ उपलब्ध असू शकतो तर आपल्याकडे का नाही? समाजातील १०% वर्ग व्यवसायात आहे, आणि यातील १०% मोठे व्यावसायिक, उद्योजक होतात. म्हणजे शंभरातुन एक मोठा उद्योजक बनतो. याचेही कारण वेळ मॅनेजमेंट हेच आहे. ते स्वतःला प्रोसेस मधे अडकवून न ठेवता फक्त मॅनेजमेंट पाहतात. व्यवसायात जसजसे वरच्या पातळीवर जाण्याची वेळ येते तसतसे ते आपल्या हाताखाली टीम वाढवत चालतात. आणि त्या टीम कडून काम करून घेतात.

काय चुकतंय? कदाचित टाईम मॅनेजमेंट चुकत असेल. एकदा दिवसभराच्या कामाचा त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा आलेख समोर मांडून पहा..

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

2 thoughts on “सगळं चांगलं चालू आहे, तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. पण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!