लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
प्रोडक्शन, सर्व्हिस कॉस्ट हि चेष्टेवारी किंवा सहज घेण्याची गोष्ट बिलकुल नाही. व्यवसायात प्रोडक्शन कॉस्ट ला खूप महत्व असते. बऱ्याच जणांना प्रोडक्शन कॉस्ट चे गांभीर्य जाणवत नाही. दोन रुपये वाढल्याने काय फरक पडतो असा विचार करताना दिसून येतात. किंवा सप्लायरशी बार्गेनिंग करायला मी काय भिकारी आहे का असाही विचार बरेच जण करतात. बार्गेनिंग केल्याने आपले स्टेटस खाली येते असाही काहींचा समाज असतो. पण असे काहीही नाही. असले विचार तात्काळ बाजूला सारा. आपल्या उत्पादनासाठी किंवा आपण देत असलेल्या सेवेसाठी जो जो खर्च होतो त्या प्रत्येक खर्चात बचत कशी करता येईल याचा आपण विचार केलाच पाहिजे.
ज्याला प्रोडक्शन कॉस्ट चे गांभीर्य कळत नाही त्याचा व्यवसाय जास्त काळ टिकत नाही . आपण मार्केटमधे आपल्या मनाप्रमाणे रेट लावून आपले प्रोडक्ट विकू शकत नाही. मार्केटच्या कलानेच आपल्याला जावे लागत असते. खासकरून ज्यावेळी आपले प्रोडक्ट स्टॅंडर्ड मार्केटचा भाग असते आणि त्याच प्रोडक्टसाठी आणखीहकितीतरी सप्लायर्स मार्केटमधे असतात अशावेळी तर आपल्याला आपल्या उत्पादनाचे दर नियंत्रणातच ठेवावे लागतात. अशावेळी प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करणे तर अतिशय महत्वाचे असते. नफा मिळविणे हेच तर व्यवसायातुन अपेक्षित असते. नफाच कमी झाला तर व्यवसाय करून काय फायदा? नफा नसेल तर व्यवसाय बंद करायची वेळ येईल.
प्रोडक्शन कॉस्ट हे काय फक्त लहान व्यावसायिकांचे काम नाही. प्रत्येक व्यावसायिकाला, उद्योजकाला, कंपनीला, अगदी मोठ्यातमोठ्या कंपन्यांनासुद्धा प्रोडक्शन कॉस्ट वर सतत काम करावे लागत असते. ६ कोटीची गाडी बनवणारी रोल्स रॉयस कंपनी प्रोडक्शन कॉस्ट वर काम करत नसेल का? तेही करतात. गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता प्रत्येक कंपनी प्रोडक्शन कॉस्ट मध्ये कमी करण्यासाठी काम करत असते. अगदी अर्ध्या, पाव टक्क्याच्या बचतीसाठी सुद्धा काथ्याकूट केला जातो.
प्रोडक्शन कॉस्ट मधे बचत करणे म्हणजे गुणवत्तेत तडजोड करणे असे बिलकुल नाही. आपण काही कच्चा माल घेत असू तर त्यात बार्गेनिंग करून रेट कमी करण्याचा प्रयत्न करणे, कर्मचाऱ्यांकडून जास्त क्षमतेने काम करून घेण्याचा प्रयत्न करणे, अवांतर खर्चात बचत करणे अशा काही मार्गांनी प्रोडक्शन कॉस्ट कमी केली जात असते.
प्रोडक्शन कॉस्ट मधे बचत म्हणजे नफाच असतो. यात नेहमी हिशोब टक्क्यात करायचे असतात. हजार रुपयाच्या वस्तूवर २ रुपयांसाठी काय बार्गेनिंग करायची असा विचार कधीही करू नका. जिथे शक्य होईल तिथे खर्च कमी करायच हेच उद्दिष्ट असायला हवे. अगदी अर्थ टक्का वाचत असेल तर, वर्षभरात जर एखाद कोटींचा टर्नओव्हर असेल तर अर्धा टक्का म्हणजे ५० हजार रुपये होतात. यातून काही कर्मचाऱ्यांचे पगार निघतात, किंवा काही महीन्यांचा खर्च निघतो, किंवा कर्जाचे हफ्ते सुटतात… अगदी लहान व्यवसाय आहे, दहा लाखाचीउलाढाल आहे, तरी यावर अर्धा टक्का बचत म्हणजे तुमचं एक महिन्याचं शॉपच भाडं होतं.
कॉस्ट कटिंग हि सवय आहे. हि सवय जेवढी अंगवळणी पडेल तेवढं तुमच्या व्यवसायासाठी फायद्याचे आहे. कुणी त्याची चेष्टा करत असलं तरी त्यांच्या विचाराने तुम्ही प्रभावित होऊ नका. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याचे उद्दिष्ट ठेवा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील