लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
२०-२२ वर्षांपूर्वी माझे राहते घर असलेली जागा आम्ही विकत घेतली होती. त्यावेळी १४२ रुपये स्क्वे.फू. दराने प्लॉट घेतला होता. प्लॉट च्या व्यवहारात एक एजंट मध्यस्ती होते. या क्षेत्रातील अनुभवी आणि जुनेजाणते होते. देणारा घेणारा दोघेही तयार झाल्यावर आम्हाला चर्चा करण्यासाठी प्लॉट मालकाकडे जायचे होते. त्या ब्रोकरने माझ्या वडिलांना आमच्या घरी असतानाच विचारलं कि तुम्हाला कितीपर्यंत प्लॉट परवडणार आहे? वडील म्हणाले १४० पर्यंत मी घेऊ शकतो, पण जास्तीत जास्त १४५ रु. पर्यंत माझी तयारी आहे., त्यापुढे माझी प्लॉट घेण्याची तयारी नाही. एजंट म्हणाले, ठीक आहे…
दोघे प्लॉट मालकाच्या घरी गेले. वडील, एजंट आणि मालक, तिघांचीही चर्चा सुरु झाली. मालक काहीतरी १५० च्या आसपास भावावर असून बसले होते, आणि वडील १३५ वर. १४० आणि १४५ पर्यंत चर्चा आली. शेवटी एजंट ने मध्यस्ती करून स्वतःच १४२ वर भाव ठरवला आणि व्यवहार फिक्स करून टाका म्हणाले. दोघांनीही संमती दर्शवली आणि लगेच टोकन रक्कम देऊन टाकली… या व्यवहारात एजंट ची फी होती २%. आमच्याकडून, आणि प्लॉट मालकाकडून. दोघांकडूनही २-२% फी आणि सरळ व्यवहार. कुठेही लपवाछपवी नाही, मालकाने सांगितलेल्या भावावर वाढवून भाव सांगणे नाही, प्लॉट घेणाऱ्याला लुबाडायचं नाही आणि देणाऱ्याला फसवायचं नाही, २% चा सरळ व्यवहार. व्यवहार झाल्यावर दोन्ही पार्ट्यांनी त्यांना त्यांची फी दिली, तोपर्यंत रुपया घेतला नाही. आजही त्यांची प्रॅक्टिस चांगली चालू आहे, चांगला पैसा कमवतात, समाधानी कुटुंब आहे, मुलं सेटल झाली आहेत, आणि मुख्य म्हणजे त्यांच्याबद्दल बाहेर कुणी वाईट बोलतही नाही, कारण व्यवहारात ते एकदम पारदर्शी होते.
वीसेक वर्षांपूर्वी असे एजंट असायचे. त्यानंतर हळूहळू ट्रेंड बदलत गेला. या लोकांचं यश पाहून बऱ्याच युवकांना य क्षेत्रात यायची इच्छा व्हायला लागली. धंदा वाईट बिलकुल नाही. पण बहुतेकांनी अति पैशाच्या हव्यासाठी रियाल इस्टेट मधली सरळमार्गी प्रॅक्टीसच संपवली. प्लॉट मालकाने १०० रुपये किंमत सांगितली कि याने पुढे २०० सांगावी, पुढच्या एजंट ने अडीचशे सांगावी, यातून मार्केटचे रेट उगीचच वाढवावेत, असे प्रकार वाढत गेले. प्लॉट घेणारा बकरा आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहायला सुरुवात झाली. त्याला ग्राहक म्हणून पाहणे बंद झाले. यातून या क्षेत्रातील विश्वासार्हताच संपली. या संपलेल्या विश्वासार्हतेमुळेच आता एजंट टाळून थेट व्यवहार करण्याकडे कल वाढायला लागला आहे.
याच मुख्य कारण आहे, एका झटक्यात खूप सारा पैसा कमवायचा अशी विचारसरणी. या जुन्या एजंट लोकांची श्रीमंती अशाच व्यवहारातून येत होती, पण ते त्यासाठी हपापलेले नसायचे. दहा-वीस लहानसहान व्यवहारानंतर एखादा मोठा व्यवहार व्हायचा, त्यातून चांगला पैसा मिळायचा, मग पुन्हा लहानसहान व्यवहार होत राहायचे. पण या पुढच्या व्यावसायिकांना असं वाटायचं कि एखादा मोठा व्यवहार करायचा आणि काही महिने निवांत व्हायचं. त्या यशस्वी ब्रोकरचं यश पाहायचे, पण त्यासाठी त्याने आयुष्याची दहा-वीस वर्षे खर्ची घातलेली आहेत याकडे दुर्लक्ष करायचे.
फक्त त्याच्यासारखा एका झटक्यात मोठा पैसा कमवायचा एवढंच उद्दिष्ट राहिलं. यातूनच लहान लहान व्यवहारांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, जे काही व्यवहार होण्याची शक्यता असायची त्यात मूळ भावापेक्षा दुप्पट तिप्पट वाढवून भाव सांगण्याच्या पद्धतीमुळे ते व्यवहारही होणे कमी झाले. या पूर्णपणे अपारदर्शी व्यवहाराच्या पद्धतीमुळे या क्षेत्रातील विश्वासार्हता संपत चालली, आणि यात एक पोकळी निर्माण झाली. हि पोकळी रिअल इस्टेट वेबसाईट्सनी भरून काढायला सुरुवात केली. काही एजंट नि साधा सरळ व्यवहार केंद्रित ठेऊन लहान लहान व्यवहारात हात घालायला सुरुवात केली. म्हणजे खूप जण या क्षेत्रात आले, पण खूप जणांपैकी खूप जण एकाच पद्धतीकडे आकर्षित झाले, ती म्हणजे कमी वेळात जास्त पैसा, आणि यातून एक मोठी जागा मोकळी राहिली, जी इतरांनी हळूहळू भरून काढली. आता मागे वळता येत नाही, दाटी वाढायला लागली, ज्यांनी पोकळी भरून काढली ते इतके मोठे झालेत कि आता त्यांच्या ससहकार्याने व्यवसाय करावा लागतोय. कित्येकजण फक्त दुसरीकडे काही होऊन शकत नाही म्हणून इथे टिकून आहेत अशी परिस्थिती आहे. बरेच जण कागदपत्रांची कामे करणे एवढ्यापुरतेच मर्यादित झाले.
हे फक्त रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित नाही. इतरही क्षेत्रात असाच प्रकार सुरु आहे. फक्त मोठं काम पाहायचं, लहान कामाकडे दुर्लक्ष करायचं. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, लहान कामांना नाही म्हणणारे, आणि मोठ्या कामात अति पैसा कमावण्याचा प्रयत्न करणारे, अशा व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. पण, लहान कामं सोडल्यामुळे फिरता पैसा कमी होतो, मग जे अधिमधि मोठं काम मिळतंय त्यात ग्राहकाला ओरबाडायचं, असा प्रकार सुरु झाला आहे. यातून ग्राहकाची नाराजी ओढवते, आणि विश्वासार्हता संपत जाते. इथेही लहान लहान कामांची, विश्वासार्हतेची पोकळी निर्माण हिते, आणि कुणीतरी ते भरून काढायचा प्रयत्न करतंच…
सुरुवातीला सांगितलेला तो किस्सा सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे त्यावेळची व्यवहारातील विश्वासार्हता आणि आपले ग्राहक असलेल्या दोन्ही पार्ट्यांचा फायदा आणि समाधान पाहण्याची मानसिकता. हि मानसिकता आता कमी होताना दिसत आहे. मला असे व्यावसायिक नेहमीच भेटतात. अगदी मागच्या वर्षी आमच्या घराचं रंगरंगोटीचं काम ज्याने केलं होतं, त्याच नाव उभ्या आयुष्यात कुणाला रेफर करू शकत नाही असा त्याने कारभार केला होता. कदाचित मला शिकवायसाठीच असे व्यावसायिक मला जास्त भेटतात कि काय असंच कधीकधी वाटतं, इतकी हि संख्या वाढत चालली आहे…यातून यांना कमी कष्टात जास्त पैसा कमवल्याचं समाधान मिळत असेल पण हे आपली विश्वासार्हता गमावत चालले आहेत. हे जास्त लांब जाऊ शकत नाहीत.
नवीन व्यावसायिकांसाठी हीच मोठी पोकळी आता निर्माण झाली आहे. तुमची विश्वासार्हता जपा, आणि स्वतःच्या आधी ग्राहकाचा विचार करा. ग्राहक लुबाडण्यासाठी असतो हे फिल्मी डायलॉग आहेत, प्रत्यक्षात ग्राहक जपायचा असतो. तो मूर्ख असतो, XX असतो, असले विचार कुचकामी आहेत. तो तुमच्यावर विश्वास ठेवतो म्हणून तुमच्याशी व्यवहार करतो. ज्यादिवशी त्याचा तुमच्यावरच विश्वास उडेल, त्यादिवशी तुम्ही संपलेले असाल…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील