लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
दररोजचे होणारे रिचर हा मोबाईल दुकानदारांसाठी लहान इन्कम चा स्रोत होता, महिन्याला जास्तीत जास्त ५-१० हजार त्यातून मिळायचे, पण ते दुकानाचे लहानसहान खर्च भागवण्यासाठी पुरेसे असायचे. दुकानाचे लाईटबील, थोडेफार भाडे, साफसफाई यांचा खर्च त्यातून निघत असे. पण रिचार्ज साठी वेबसाईट सुरु झाल्या, app आले आणि हा स्रोत आटला.. आता पूर्वीच्या १०% सुद्धा रिचार्ज दुकानातून होत नाहीत. याचा दुकानदारांना मोठा फटका बसला. यातून जो खर्च भागायचा त्यासाठी आता मुख्य व्यवसायातून खर्च सुरु झाला.
वरवर हि लहान गोष्ट वाटेल पण, यामुळे मोबाईल दुकानदारांची अर्थव्यवस्था बिघडली. ईकॉमर्स वेबसाईट्स मुळे सर्वात जास्त नुकसान मोबाईल दुकानदारांचंच झालं आहे, पण इथे तो विषय नाही. मोबाईल दुकानदारांसाठी रिचार्ज चा व्यवसाय लहान होता पण महत्वाचा होता. तो इतर खर्चासाठी पुरेसा असायचा आणि मुख्य उत्पन्नाला वाढवण्याचे काम करायचा.
बहुतेक व्यवसायांमधे अशी कामांची विभागणी होतेच. २०-३०% मोठी कामे सोडली तर उरलेली कामे लहान कॅटेगरीतच मोडतात. पण आता बऱ्याच व्यावसायिकांना लहान कामे नकोशी वाटतात. कालच्या एका लेखातही यावर थोडे मत मांडले होते. फक्त मोठी कामे घ्यायची, मोठे पेमेंट करणारे कस्टमर पाहायचे यावरच भर असतो. उदाहरणादाखल, कापडाचे दुकान असेल तर मोठी खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनाच किंमत द्यायची, एखादा शर्ट घयायला आलेल्या ग्राहकाला दुर्लक्षित करायचं. किंवा इंडस्ट्रिअल सेक्टरमधे असेल तर फक्त मोठ्या ऑर्डरचे कस्टमर शोधायचे, आणि लहान कस्टमर दूर करायचे.
आपल्या दैनंदिन जीवनात घरातील लहान-लहान कामांसाठी आता सर्व्हिस प्रोव्हायडर लवकर मिळत नाहीत, सर्वांचीच हि समस्या झाली आहे. अगदी प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल, फॅब्रिकेशन संबंधी लहानलहान कामांसाठी कुणी येत नाही. फक्त मोठं काम हवं अशीच मानसिकता दिसून येते.
हि पद्धत बहुतेकांना भारी वाटते. कमी एनर्जी लागते, जास्त पैसा मिळतो वगैरे… काही व्यावसायिकांना ‘मी लहान कस्टमर घेत नाही’ अशा प्रकारे सांगण्यात काहीतरी स्टेटस सिम्बॉल वाटतो. काहींना लहान कामांचा कंटाळा येतो. पण जर लहान उत्पन्नाचे स्रोत जर आश्वासक असतील, खात्रीशीर असतील तर सोडायचे कशाला? त्यांना दुर्लक्षित का करायचे? कस्टमर ऑर्डरदृष्ट्या मोठा असो किंवा लहान तो तुम्हाला काहीतरी उत्पन्न देतच आहे. कोणत्याही व्यवहारात तुम्हाला नफा सारखाच मिळणार आहे. दिवसभरात १००० रुपयाचा एक ग्राहक मिळाला किंवा १००-१०० चे दहा ग्राहक मिळाले, उत्पन्न सारखेच मिळणार आहे. मग ते सोडून फायदा काय होणार आहे. उलट फक्त हजारचाच ग्राहक पाहिजे असा अट्टाहास ठेवला तर शंभर वाले कितीतरी ग्राहक हाताचे निघून जातात.
जसं प्रोडक्शन कॉस्ट मधे अर्धा टक्का बचत केल्याने शॉप चा महिनाभराचा खर्च निघू शकतो तसंच हे लहान लहान स्रोत जोडल्याने आपला अवांतर खर्च त्यातून निघून जातो हि गोष्ट बऱ्याचदा दुर्लक्षित केली जाते. लहान लहान कामे असणारा मोठा वर्ग असतो, तो दूर झाल्याने मोठा कस्टमर बेस आपल्यापासून दुरावतो. तो कुणाकडेतरी जाणारच आहे. पण तुमच्यापासून दुरावला जाणार असतो. आणि मोठ्या कामांची संख्या मर्यादित असते, अशावेळी यात स्पर्धा वाढते, ज्यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते, यात प्रॅक्टिस करणाऱ्यांची संख्या वाढली कि ग्राहक संख्या कमी होत जाते. एकूणच व्यवसायाला त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
लहान असो वा मोठा कस्टमर आपल्याला सारखाच नफा देणार असतो. अशावेळी लहान लहान कामांना नाकारून आपल्याच व्यवसायाला आर्थिक नुकसान होईल असे काहीहि करू नका. व्यवसायाचा अवांतर खर्च अवांतर कामातून निघत असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. ती सिस्टीम डिस्टर्ब करायची गरज नाही. आणि खूपच प्रॅक्टिकली माहिती घ्यायची असेल तर कोणत्याही मोबाईल शॉपी वाल्याला विचारा कि रिचार्ज चा धंदा कमी झाल्याने व्यवसायावर काय परिणाम झाला आहे… कोणतच काम टाळू नका. आर्थिक निकषांवर कामात भेदभाव करू नका.
काही वेळेस व्यवसायात एका उंचीवर गेल्यावर काही कारणाने लहान कामे घेणे शक्य होत नाही, किंवा आपला एक ग्राहक निश्चित होऊन जातो, अशावेळी लहान कामे घेण्याची आवश्यकता भासत नाही, किंवा ते शक्य होत नाही. पण अशी परिस्थिती दुर्मिळ असते, आणि व्यवसाय चांगला मोठा झाल्यावर निर्माण होत असते. अशी परिस्थिती अपवाद समजावी. आणि मुख्य म्हणजे तिथे आर्थिकदृष्ट्या भेदभाव नसतो तर कामाची पद्धती अशी झालेली असते कि लहान कामे घेणे शक्य होत नाही. व्यवसायात असे टप्पे असतात, आपण वरच्या टप्प्यावर पोचलो कि खालच्या पायरीवरील ग्राहक आपल्यापासून दूर जातात, आपण नवीन ग्राहकापर्यंत पोचतो, अशावेळी आपल्या खालच्या पायरीवर नवीन एखादा व्यावसायिक तयार होत असतो, आणि आपल्यापासून दुरावलेला ग्राहक जोडून घेतो… हे चक्र असेच चालू राहते.
(ईकॉमर्स कंपन्यांमुळे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिकस व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे, पण इथे तो मुद्दा नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने काही लिहिलेले नाही)
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील