लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायाच्या ठिकाणी फक्त व्यवसायाशी संबंधितच कामे चालली पाहिजेत. आणि इतर वेळी व्यवसायाशी संबंधित गोष्टी दूर ठेवल्या पाहिजेत.
कामाच्या वेळेत फक्त कामच केले पाहिजे आणि इतर वेळी कामाचा तणाव पूर्णपणे दूर केला पाहिजे असाच नियम असायला हवा.
कामाच्या ठिकाणी गेम खेळत बसने, मोबाईलवर टाईमपास करणे, पार्ट्या करणे असल्या प्रकारांमुळे व्यवसाय कधी संपून जातो कळतही नाही, आणि ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी कार्यक्रम वाजलेला असतो. व्यवसायाच्या ठिकाणी घरी असल्यासारखा टाईमपास करू नये.
काही कौटुंबिक तणाव असेल तर त्याचा परिणाम व्यवसायावर कधीही होता कामा नये. घराच्या तणावामुळे व्यवसायात लक्ष लागत नसेल तर आपला व्यवसाय धोक्यात आहे हे लक्षात घ्यावे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर रिफ्रेशमेंटची गरज आहे हे समजून घ्यावे.
याच प्रकारे, व्यवसायाचा तणाव आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही पडू देऊ नका. व्यवसायात काही प्रॉब्लेम आहेत म्हणून घरी वावरताना सुद्धा टेन्शनमधे वावरणे, कुटुंबियांवर चिडचिड करणे, कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करणे, सतत वाद घालणे, लहान लहान गोष्टींवर वाद सुरु करणे अशा प्रकारांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं. नात्यांची हानीसुद्धा होते. काहीजण घरी असतानाही फक्त व्यवसायाचीच कामे करताना दिसतात, असला प्रकारही बंद केला पाहिजे.
घरातून काही व्यवसाय हाताळत असाल तर तिथे अशी जागा तयार करावी जिथे कुटुंबाचा संबंध येणार नाही.
व्यवसायाशी संबंधित काही महत्वाच्या चर्चा असतील, काही तणावाच्या चर्चा असतील तर त्या कुटुंबीयांसमोर करू नयेत.
फोन कॉल कुटुंबियांपासून दूर जाऊन करावेत.
कुटुंबियांना तुमच्या व्यवसायातील अंतर्गत बाबी माहित नसतात. तुम्ही फोनवर काही (अगदी नेहमीची) चर्चा करताना एखादा शब्द टेन्शनमधे बोलून गेलात तर कुटुंबीय जास्त टेन्शनमध्ये येत. तुम्हाला सामान्य वाटणारी बाब त्यांना जास्त मोठी वाटू शकते, आणि संपूर्ण वातावरणच बिघडून जाते.
काही वेळेस आपल्या व्यवसायात कुटुंबीयांची दाखल वाढते. यातूनही वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
नफा तोटा हा व्यवसायच भाग असतो, पण कुटुंबियांना व्यवसायाचे गणित माहित नसेल तर एखाद्या तोट्यासंबंधी केलेल्या चर्चेवरून तुम्ही काहीतरी भयंकर परिस्थिती अडकले आहात असा अर्थ काढला जाऊ शकतो, आणि त्यातून सगळेच टेंशमनमधे वागायला सुरुवात करतात.
पण, काही मोठ्या अडचणीत असाल, एखादं मोठं संकट असेल, त्याचा कुटुंबावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असेल तर कुटुंबियांशी नेहमी चर्चा करा. त्यांना यातलं काही कळत नाही, किंवा त्यांना कशाला त्रास द्यायचा या विचाराने कुढत बसू नका. कित्येकदा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल पण ते कुटुंबियांना माहित नसेल तर त्यांचा खर्च नेहमीप्रमाणेच करत राहतात, आणि तुमची पैशाची जुळवाजुळव करताना दमछाक होते, अशावेळी तुमची चिडचिड वाढते, आणि कुटुंबियांना तुम्ही असे का वागत आहात ते कळत नाही, यातून मग वाद उद्भवतात. यापेक्षा जर त्यांना परिस्थिती माहित असेल तर ते स्वतःहूनच तुम्हाला साथ देतात. उलट त्यांच्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला मदतही करतात.
घर आणि व्यवसाय यात फरक करणे व्यावसायीक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी महत्वाचे आहे. पण यासोबतच कुटुंब हे आपले फर्स्ट एड किट आहे हे लक्षात घ्या. अडचणीत सर्वात आधी आपले कुटुंबच आपल्या मदतीला येत असते… संकटांच्या परिस्थितीत नेहमी कुटुंबियांना सोबत घेऊन पुढे जाणे यामुळेच महत्वाचे असते. पण सामान्य परिस्थितीमधे चुकूनही व्यवसायाला घरात घेऊन जाऊ नका, आणि घराला व्यवसायात आणू नका…
व्यवसाय आणि कुटुंब या दोघांनाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, पण दोघेही स्वतंत्र आहे, यांची सरमिसळ करू नका, कुणालाही एकमेकांवर वरचढ होऊ देऊ नका. कुणा एकासाठी दुसऱ्याला डिस्टर्ब करू नका, त्यापेक्षा या दोघांचाही सुवर्णमध्य कसा काढता येईल याचा विचार करा.
व्यवसाय साक्षर व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील