अनावश्यक तुलनेच्या चक्रव्यूहात अडकू नका


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपण अनावश्यक तुलनेच्या नेहमीच आहारी जातो. मित्रांशी तुलना, व्यावसायिकांशी तुलना, नातेवाईकांशी तुलना… जिथे आपला संबंध एखाद्या व्यक्तीशी येतो तिथे आपली तुलना सुरु होते. तुलना हे नैराश्याचे एक मोठे कारण आहे. व्यवसायिकांमधे, मुख्यत्वे नवउद्योजकांमधे, या तुलनेच्या मानसिकतेचं प्रमाण मोठं आहे.

आपण नेहमीच आपल्या जवळ असणाऱ्यांशी तुलना करत असतो. मित्र, नातेवाईक, व्यावसायिक मित्र, आपल्या प्रोफेशनमधील ओळखी-अनोळखी लोक, परिसरातील लोक अशांशी नेहमी आपण स्वतःची तुलना करत असतो. आता यात सोशल मीडियावरील लोकांचाही नंबर सुद्धा लागलेला आहे. जो समोर आहे त्याच्याशी आपण तुलना करतो, ज्याच्याबद्दल आपल्याला माहीतच नाही किंवा ज्याचा आपल्याशी दुरान्वयेही संबंध नाही अशांशी आपण स्वतःची तुलना करत नाही, भले तो आपल्या समोर असो किंवा शेजारी असो.

आपण ज्यावेळी आपली कुणाशीतरी तुलना करतो त्यावेळी आपण नकळतपणे स्वतःला कुठेतरी खालच्या स्तरावर गृहीत धरलेले असते. समोरचा माझ्यापेक्षा कुठेतरी सरस आहे हि भावना आपल्याला त्याच्याशी तुलना करायला भाग पडते. यातून आपल्यामधे स्वतःबद्दलची नकारात्मक भावना तयार होत जाते, मग या नकारात्मक भावनेला उत्तर म्हणून आपण त्याच्याशी स्पर्धा करायला लागतो, त्याला सतत हरवण्याचा प्रयत्न करायला लागतो, नकळतपणे त्याला आपल्या शत्रुस्थानी पाहायला लागतो. यातून पुढे तिरस्कार, द्वेष वाढायला लागतो.

या चक्रव्यूहात जर आपण अडकलो तर आपला व्यवसायच धोक्यात येऊ शकतो .

याचा पुढचा टप्पा असतो तो आपल्याच व्यवसायाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा. आपल्याला आपल्याच गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात. खालच्या दर्जाच्या वाटायला लागतात. नकोश्या व्हायला लागतात. चिडचिड वाढते, व्यवसायाकडे दुर्लक्ष होते, इतरांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटायला लागतात, आपले सर्व काही खराब वाटायला लागते. अगदी दुसऱ्यांच्या आनंदात, यशातही आपल्याला दुःख व्हायला लागत. यातून प्रत्येक गोष्ट टाळण्याकड़े कल वाढायला लागतो. आपलाच व्यवसाय नकोस व्हायला लागतो. अशा परिस्थितीमधे पुढे काही शिल्लक राहण्याचा विषयच संपतो.

अशी अवस्था मी स्वतः माझ्या एका मित्राची पाहिलेली आहे. त्यामुळे तुलना करण्याची मानसिकता मला चांगलीच लक्षात आलेली आहे.

तुलना कुणाशीही कधी करू नका. कुणाशीतरी स्वतःची तुलना करणे हे स्वतःचा अपमान करण्यासारखेच आहे. स्वतःकडे तुच्छतेने पाहाण्यासारखे आहे. तुलना न करताही चांगले जगता येते. समाधानकारक व्यावसायिक आयुष्यासाठी तुलनेच्या व्यसनापासून लांब राहणे नेहमीच महत्वाचे आहे. इतरांच्या यशामधे तुम्हाला आनंद झाला पाहिजे, त्यांच्या अपयशाचे दुःख तुम्हालाही झाले पाहिजे. तुलनेच्या भावनेतून कुणाच्यातरी विरुद्ध उभे राहण्यापेक्षा सहकार्याच्या भावनेतून एकमेकांच्या साथीने पुढे जाणे कधीही फायद्याचेच असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!