लेखक : उदय पिंगळे
====================
90% गुंतवणूकदारांना येणारा अनुभव म्हणजे आपण विकलेल्या शेअर्सचा भाव लगेच वाढणे. जणू काही मी विकलेला शेअर्स वाढण्यासाठी, तो मी कधी विकतो याची वाटच पहात होता. असे झाले की आपल्याला फायदा किती मिळाला यापेक्षा आभासी तोटा किती झाला याचे विचारचक्र सुरू होते. त्यामुळेच शेअर्स खरेदी करणं तुलनेने सोपे आहे पण नेमके कधी विकायचे या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. हा एक चक्रव्यूह आहे याचा भेद कसा करावा हा अनुभवी लोकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा याकडे एक खेळ यादृष्टीने पाहावे आणि विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.
जे लोक ट्रेडर्स आहेत ते त्यांनी ठरवलेल्या अथवा त्यांना मान्य असलेल्या किमतीस किंवा शेवटच्या क्षणी नफा होवो अथवा तोटा बाहेर पडणारच. भावात होणारी वाढ अथवा घट पाहून यातील काही लोकांची मनस्थिती दोलायमान होऊन कदाचित त्यांनी आधी जे ठरवले असेल त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय घेऊन अनेकदा मोठे नुकसान करून घेतात. तेव्हा अशा लोकांनी आपली नुकसान सोसण्याची क्षमता किती? आणि किती फायदा म्हणजे समाधान? हे आधीच निश्चित ठरवावे.
ब्रोकरेज फर्मना ग्राहक जेवढी उलाढाल करतील तेवढे हवे असते एकंदरीत आपल्या ग्राहकांचा पर्यायाने फर्मचा टर्न ओव्हर कसा वाढेल, हे ते पहात असतात. यात गुंतवणूकदाराचा नफा तोटा काहीही झालं तरी त्यांचे ब्रोकरेज पक्के असते. हे लोक मुद्धाम फोन करून यात एवढा फायदा आहे तेव्हा तो विकून हा घ्या असे फोन करून आपल्या खातेदारांना सांगत असतात. यामुळे मनात गोंधळ उडणे सहाजिकच आहे. त्यांच्या या सुचनेमागील हेतू ओळखावा आणि गुणवत्तेनुसार यासंबंधी निर्णय घ्यावा. पैशांची आत्यंतिक गरज हे आणखी एक महत्वाचे कारण असू शकते. जर हा एकमेव अंतिम पर्याय शिल्लक असेल तर याबाबत कुणाचेच दुमत होणार नाही, कारण अशा परिस्थितीत कोणत्याही नफ्यातोट्याचा विचार न करता पैसे उभे करणे हे अधिक महत्त्वाचे असते. अशी अपवादात्मक परिस्थिती वगळता शेअर्स कधी विकायचे? असा प्रश्न पडत असेल तर ते कोणत्या परिस्थितीत विकू नये, ते आधी पाहू.
समजा एका कंपनीचे, तुमच्या मूलभूत निकषांवर उतरलेले तुम्ही घेतलेले शेअर जेव्हा 10% वाढतात तेव्हा त्याच भावाने अथवा यापेक्षा कमी भावाने ते खरेदी करणारी व्यक्तीना फायदा करून घ्यावा असे वाटते काहींना भाव कदाचीत खाली येतील असे वाटते. अशा प्रसंगात तुम्ही काय कराल ? समजा तुम्ही काहीच केलं नाहीत आणि काही दिवसांनी भाव अजून 10% वाढले मग काय कराल? तुम्हाला कदाचित नफा करून घ्यावा असे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे त्यामुळे तुम्ही काही प्रमाणात नफा मिळवणे जरुरीचे आहे. असा नफा एकदम करून घेतला तर आणि नंतर भाव वाढले, आणखी वाढून खाली आलेच नाहीत तर तुम्हाला जो एकरकमी फायदा झाला तेवढ्यावरच समाधान मानावे लागेल किंवा नंतर तुम्हाला वाटले की ही कंपनी जबरदस्त आहे तर अधिक भावाने ते खरेदी करावे लागतील यात तुमची मूळ सरासरी किंमत वाढणार त्यावरील ब्रोकरेज जाणार. मोठया प्रमाणात फायदा झाल्याने अल्पकालीन / दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कदाचित कर द्यावा लागणार. ज्या कंपनीचे शेअर चांगले आहेत याचा अभ्यास करून तुम्ही ते दीर्घकाळ ठेवले आणि क्षणिक मोहाने का विकले असे तुम्हाला वाटून त्याचा पश्चाताप तुम्हाला होणार.
म्हणून कितीही फायदा मिळत असेल तरी घाऊक प्रमाणात असे शेअर विकू नयेत. दीर्घकालीन उद्दिष्टासाठी भाव कमी आल्यावर अल्प खरेदी आणि वाढल्यावर अल्प विक्री असे धोरण ठेवावे म्हणजे सरासरी किंमत कमी होत जाते. जर किंमत अजून वाढली आणि कंपनीविषयी खात्री असेल तर सर्वाधिक किमतीच्या अधिक किमतींनीही ते अल्प खरेदी केले तर सरासरी किमतीतही अल्प वाढ होते. मुख्य म्हणजे भाव वरखाली होत असतील तर त्याचा मनावर ताण येत नाही.
विदेशी वित्तीय संस्था, स्वदेशी वित्तीय संस्था, मोठे गुंतवणूकदार कितीही मोठे व्यवहार करीत असले तरी कोणत्याही शेअर्सला फक्त वाढत राहातील किंवा कमी कमी होत राहातील अशी एकच दिशा ते देऊ शकत नाहीत. अशा उतार चढावावर सध्या अस्तित्वात असलेले नियम पारदर्शक असल्याने एका विशिष्ठ मर्यादेतच त्याचा फरक पडतो. अंतिमतः कोणत्याही कंपनीचे भाव त्याच्या कामगिरीवर आणि त्याच्या व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणावर कमी जास्त होऊन नंतर कुठेतरी स्थिर होतात. निवडलेली कंपनी काही विशेष कारण नसताना लागोपाठ प्रत्येक तिमाहीत अपेक्षित कामगिरी करत नाही असे असेल तर अशा कंपनीचे शेअर विकणे योग्य ठरते.
अशा प्रकारे भाव खाली येत असतानाही धाडकन खाली येत नाहीत मध्येच उसळी मारतात. यासाठी (dead cat bounce) असा छान शब्दप्रयोग आहे, ती विक्रीची योग्य वेळ समजावी. एखादया कंपनीचे भाव तुलनात्मकदृष्टीने अशाच कंपनीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढून भरमसाठ नफा मिळवून देतात तेव्हा ते विकून तशाच प्रकारच्या आघाडीच्या कंपनीकडे आपली गुंतवणूक वळवावी, त्यासाठी घेतलेले शेअर विकायला हरकत नाही.
शेअर विक्रीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या फंडामेंटल आणि टेक्निकल अशा दोन्ही बाजूंचा विचार करावा.
हे करताना–
- वार्षिक अहवालावर नजर टाकावी (हे वार्षिक अहवाल नक्की कोण पहातात याबद्दल मला शंका वाटते) यातून अनेक गोष्टी सहज समजतात. त्यातील अध्यक्ष/ व्यवस्थापकीय संचालक यांनी भागधारकांना कंपनीच्या सध्याच्या आणि भविष्यातील योजना याबाबत काय मत व्यक्त केलंय ते पहावं. अशा योजना नसणे ही प्रगती थांबल्याचे लक्षण आहे.
- कंपनीची प्रगती व महत्वाच्या व्यक्तींच्या पगारावरील होणारा खर्च याची तुलना करावी. अनेक वेळा कोणतीही प्रगती न दाखवता या व्यक्तीच्या मानधनात/ पगारात मोठी वाढ होत असते.
- आपल्या उपकंपन्यांशी केलेले व्यवहार पाहावेत.
- ऑडिटर्सचे शेरे वाचावेत काही अयोग्य गोष्टी लक्षात येत असतील तर काळजीपूर्वक पहाव्यात.
- भविष्यातील योजनेमुळे कंपनीचा कर्जबाजारीपणा वाढत तर नाहीना ते पहावं.
- भागधारकांच्या आलेल्या तक्रारी, सोडवलेल्या न सोडवलेल्या तक्रारी यांचे प्रमाण तपासावे.
- कंपनीच्या उत्पादनाची भारतातील मागणी आणि जगातील मागणी याविषयी माहिती मिळवावी.
- ROC आणि ROCE हे दोन महत्वाची गुणोत्तरे तपासावी आणि ती मागील 3 वर्षीच्या सरासरी गुणोत्तराच्या प्रमाणात कमी झालेली नसावीत.
- बाजारभाव व उलाढाल यांच्या चार्टवरून कंपनीचा सर्वसाधारण कल पहावा. यासाठी लिनीअर स्केल ऐवजी लॉगरिथमिक स्केलचा चार्ट वापरण्यास प्राधान्य द्यावे. टेक्निकलवाल्यांकडून यातील फरक समजून घ्यावा. एकाच कंपनीचे असे दोन्ही प्रकारचे चार्ट पाहिले नुसत्या नजरेने ते वेगळे आहेत हे लक्षात येईल.
(A logarithmic price scale uses the percentage of change to plot data points, so, the scale prices are not positioned equidistantly. A linear price scale uses an equal value between price scales providing an equal distance between values.)
*हायर हाय (HH) आणि लोवर लॉ (LL) मधील गुंतवणूक संधी (खरेदी/विक्री) शोधाव्यात.
*ही काही 100% बिनचूक योजना नसल्याने, हे करत असताना काही चूक झाल्यास त्याची नोंद ठेवावी. एकाच प्रकारची चूक वारंवार होऊ देऊ नये.
_
उदय पिंगळे
8390944222
लेखक गुंतवणूक अभ्यासक, मार्गदर्शक व सल्लागार आहेत.
====================
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील